बाजीराव ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)
मागील वर्षी दिवाळीच्या सुटीत गावी गेलो होतो.हीच एक वेळ असते जेव्हा आम्ही
सर्व मित्र एकत्र येतो, भेटतो, आणि पुन्हा बालपणात भटकून येतो. माणूस कितीही मोठा
झाला तरी आपल्याबद्दल आपल्या मित्राला जोपर्यंत अभिमान वाटत नाही तोपर्यंत स्वतःला
भरून पावल्यासारखे होत नाही हे खरय. म्हणजे आपल्या यशाबद्दलची मजा जोपर्यंत आपल्या
मित्राच्या नजरेत झळकत नाही तोपर्यंत जगण्याची आणि जिंकण्याची नशा अधुरीच.
दिवाळीच्या सुटीत गावी गेल्यावर बालपणीच्या सर्व मित्रांनी एकत्र यायचं.
दिवाळीच्या दुसर्या दिवशी गेट टूगेदर
करण्याची प्रथा आम्ही सर्वांनी पाडलीय. एकत्र भेटल्यावर वर्षभरातील सुख,
दुःख मौज, मजा अचीवमेटस याबद्दल गप्पा होतात. येथे येताना आम्ही एक नियम कटाक्षाने
पाळलाय...... आपली जे काही सध्य स्थितीतील लेबल्स आहेत ती सर्व घरी ठेऊन यायची.
आपले ते जुनेच आन्या, धन्या, योग्या, आव्या याच ओळखीमध्ये भेटायचे आपण. आमच्यामध्ये बरेच जन
आता डॉंक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, वकील, झालेत.
तर काहींनी स्वतःहून शेती व्यवसाय पत्करलाय. प्रत्येक वेळी बोलण्याची सुरुवात तुझ
बरंय बाबा..... काही टेंशन नाही, नाही तर आमचे आज पाणी आहे तर हवामान ठीक नाही,
हवामान ठीक आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर मजूर मिळत नाही,.... अशा तक्रार वजा
गोष्टींनी होते. आम्हाला सगळ्यांना हे आता अंगवळणी पडलय.
मग हळूच योग्या सुरुवात करतो.... काय रे धनु किती वेळ काम करतोस तू शेतात.... “काम असे एक काही नसते रे ... पडेल ते करायचे बाकी काय” इति धनु.
हो तरी पण साधारण किती तास काम करतोस दिवसातून तू? योगेश विचारतो.
“सगळे स्वनियंत्रित केलेय मी बटन दाबायचे कामे
ठेवलीत.” धनु सांगू लागतो. “तरी पण सकाळ दोन तास संध्याकाळी दोन तास.... बस्स.
आणि हो सीजन ला पळापळ होते ती वेगळी. वरतून लोड शेडींग मुळे रात्रीचे उठावे लागते.”
योगेश एव्हाना कोणत्या दिशेने निघालाय हे आमच्या घराबाहेर, गावाबाहेर,
पडलेल्या मित्रांच्या लक्षात आलेले असते. “किती उत्पन्न काढतोस रे वर्षभरात?” योगेश पुन्हा विचारतो.
“सीजन सापडला तर ७-८ लाख कुठेच नाही गेले.” धनु फुशारकीने सांगतो.
“अरे वा! मग मजा कोणाची ते सांग रे भाऊ” योग्या विचारतो पुन्हा.
बघ आता आमची कहाणी ऐक. वर्षभर काम काम आणि काम फक्त. वर्षातून फक्त ८ रजा.
वरून टार्गेट दिलेले. नाही झाले तर पगार कट. मध्येच रात्रपाळी लावलेली. कधी फोन
करून बोलावतील भरवसा नाही. आणि वर्षाचे उत्पन्न ५-६ लाखाच्या पुढे नाही.
तूच सांग आता कोण सुखी. अरे नोकरी चा अर्थच असा होतो कि नोकर बनून राहणे,
कुणाचीतरी चाकरी करणे. कधी कधी वाटते की नको हे सगळे. तुझी तीच आमची गोष्ट. ‘जगण्याची
गोष्ट सगळ्यांची सारखीच.’
“अरे सगळ्यात दुःखी कोण ची काय स्पर्धा करताय?
आपण सुखी कसे हे सांगा... सुख मानण्यात असते. सुख काही विकत घेण्याची गोष्ट नाही
कि जास्त पैसा असला म्हणजे आपण सुखी असा त्याचा अर्थ होत नाही.” आन्या उवाच.
असाच वाद-संवाद चालू होता मागील सुटीत. इतक्यात राम्या धावत आला आणि धापा टाकत
सांगू लागला.
“अरे ऐकल का?” काहीतरी सिरिअस घडले असणार हे एव्हाना आमच्या लक्षात आले होते. सर्वजन
राम्याकडे बघत होते.
राम्या सांगू लागला. “अरे, ‘बाजीराव’ने पोईजन घेतले. दवाखान्यात नेलंय
त्याला...” सर्वजन हळळले.. ‘अरेरे काय करून बसला हा...’
सर्वजन त्याला बघण्यासाठी हॉंस्पिटलला जाऊयात म्हणून सगळे उठले. गाडीत बसल्या
बसल्या माझ्या डोळ्यासमोर बाजीराव च्या आयुष्याचा कालपट सरकू लागला.... बाजीराव ला
मी सगळ्यात जास्त ओळखत होतो. प्रत्येक सुटीत आमची भेट होत होती. बाजीराव सर्व इतिवृत्त
मला सांगत असे.
बाजीरावला मी ओळखत होतो तो त्याच्या शांत स्वभावामुळे. कधी कोणाल उद्धटपणे न
बोलणारा अतिशय नम्र असा हा बाजीराव.
सुरुवातीच्या काळात शेतीला पाणी नसल्यामुळे बाजीरावने दुसर्याच्या शेतावर रोजंदारीने
जाऊन उदरनिर्वाह केला होता. या कामी आई वडिलांची चांगली साथ त्याला लाभली. लग्न
जरा लवकरच झाले. त्यामुळे तो, बायको, आई आणि वडिल अशी चार माणसे कामावर जात असत. रोजंदारीतून
मिळणारे उत्पन्न अधिक कोरडवाहू शेतीतून मिळणारे उत्पन्न यांच्या मदतीने त्याने
स्वतःची विहीरे खोदण्याचे ठरवले. स्वतःचे पाणी असल्याशिवाय आपल्याला बागायती शेती
करणे शक्य नाही याची कल्पना त्याला होती. म्हणून त्याने हा निर्णय घेतला. आधीच
कोरडवाहू भाग, विहिरीला पाणी लागणे तसे देवदूर्लभच पण बघू काही चमत्कार होतो का?
शिवाय जरी पाणी लागले तरी पावसाळा, हिवाळा ऋतूत जरी पाणी मिळेल तरी आहे ती शेती
चांगली बहरेल. उन्हाळा हिवाळा कांदे जरी लावले तरी भरपूर झाले असा विचार करून
कमाला सुरुवात केली. निरागस माणसाच्या मागे देव नेहमी उभा राहतो. प्रामाणिक
कष्टांची किंमत मिळतेच मिळते होळीच्या दिवशी पाणी लागले विहिरीला. ‘काय आनंद
झाला होता बाजीरावला!’. पाण्याची पूजा
करून संपूर्ण मळ्याला जेवण दिले होते
बाजीरावने. होळीच्या दरम्यान पाणी लागले याचा अर्थ असाही होता कि उन्हाळ्यात
सुद्धा पिण्यापुरते पाणी मिळणार होते. नाहीतर बायकोला दोन कि. मी. वरून डोक्यावर
पाणी आणावे लागे. आता आपले चांगले दिवस सुरु झाले. आपल्याला श्रीमंतीचे दिवस
जिवंतपणी पाहायला मिळणार म्हणून आईवडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. संपूर्ण आयुष्य त्यांनी
दारिद्र्यातच घालवले होते. ज्या शेतकर्यांकडे पाणी मुबलक आहे तो कधी अपयशी होत
नाही हे त्यांनी उदाहरणाने पाहिले होते.
तुटपुंज्या उत्पन्नाचा भोपळा फुटण्यासाठी पहिल्याच वर्षी घेतलेल्या भोपळा
पिकाने चांगली साथ दिली.
या वर्षी बाजीरावाने ८० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले होते. विहीर खोदण्यासाठी
चा आलेला खर्च वसूल झाला होता. शेती करण्यासाठी स्वतःचे अवजारे असणे गरजेचे म्हणून त्याने एक छोटासा टँक्टर विकत
घेतला. घरच्या शेतीची मशागत करून दुसरेही काम त्याला मिळू लागले आणि उत्पन्नात
अजून भर पडली.
दोन तीन वर्षातच बाजीरावची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आली होती. निसर्गाची
साथ आणि त्याची ढोर मेहनत यांचा परिपाक म्हणून गाडी रुळावर येण्यास अजिबात वेळ
लागला नाही. जेव्हा कधी आम्ही गावाकडे जात असू तेव्हा बाजीराव आवर्जून घरी बोलावून
चहा पाजत असे. थोड्या कालावधीत “केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी जगात एक तरी
व्यक्ती पाहिजेच. हे केलेले कौतुक माणसाला अजून उर्जा देते, हुरूप देते”, असे माझे मत आहे. ‘हा हुरूप समोर असलेला कष्टाचा डोंगर
चुटकी सरशी अर्धा करून टाकते.’
तीन वर्षापूर्वी जेव्हा बाजीराव भेटला तेव्हा बाजीरावाने बंगल्याचे काम सुरु
करायचे ठरवले होते. पण काही कारणांनी
त्याने तो रद्द केला. या वर्षी शेतात बटाट्याचे लागवड करण्याचे बाजीरावाने ठरवले
होते. अजूनही कांदा, बटाटा , लसून,आल यांच्याकडे नगदी पिके म्हणूनच पहिले जाते.
ठरल्याप्रमाणे बाजीरावने बटाट्याचे बियाणे शोधून आणून गादीवाफ्यावर बटाट्याची
लागवड करण्याचे ठरवले. गावातील हा पहिलाच प्रयोग होता.आई वडील बायकोची साथ हतीच
रात्र दिवस कष्ट करून बटाट्याचे पिक जोमाने वाढू लागले. पाणी देणे आणि एखाद दुसरा
फवारा देण्याशिवाय विशेष काही काम आता राहिले नव्हते. बटाट्यातून चांगले उत्पन्न
मिळणार याची खात्री बाजीरावला होती. ह्या वेळेला आईला आणि बायकोला एक एक दागिना बनवून देऊ असा
मनोमन इरादा त्याने केला.
दुपारच्या वेळी विशेष काही काम नसल्याने गावातील पारावर जाऊन बसण्याचे सत्र
बाजीरावने सुरु केले. तेथे गावातील काही मंडळी पत्ते खेळत बसत. १३ पानांची रमी हा
त्यांचा आवडता खेळ ते खेळत असत. बाजीरावही काही काम नाही म्हणून कुतूहलाने त्या
खेळन्याकडे बघत बसे. पत्ते खेळणार्यार्यांमध्ये नानू नावाचा बाजीरावच्या वयाचा
पट्टीचा खेळाडू होता. शक्यतो तो कधी हरत नसे. फार काही कमी नसे पण गमवावे लागत नसे
असे काही पाने फिरवायचा तो, कि हरलेली बाजी हातात चांगली पाने नसतानाही जिंकत असे.
हे सर्व पाहून बाजीरावला मौज वाटे. म्हणून बाजीराव नानूच्या पत्त्यांकडे विशेष लक्ष
देऊन बसत असे. बाजीराव नेहमी नानूच्या मागे बसून पत्त्यांकडे बघत असे. नानुही
मधूनमधून येथे हे पान पाहिजे हे पान आले तर असे पत्ते फिरवल्यास डाव पूर्ण करता
येईल अशी चर्चा बाजीरावाबरोबर करी यातून या दोघांची चांगली मैत्री झाली. पण
बाजीराव कधीही पत्ते खेळला नाही.
संध्याकाळच्या वेळी कुठेतरी अंडाभूर्जीची गाडी बघून दोघे भुर्जी खात असत. नंतर
नंतर नानूच्या आग्रहास्तव बाजीराव एक दोनदा दारूही प्यायला. दोन महिने वेगाने
सरकले दरम्यान बाजीरावची नानूच्या मित्रांबरोबर गट्टी जमली होती. नानुचे मित्र
बाजीरावच्या स्वभावाची खूप प्रशंसा करत असत. चार सहा वेळा त्यांनी बाजीरावला
पार्टीही दिली होती. बटाट्याचे पिक काढणीला आले होते. गादीवाफे नांगराने फोडून
बटाटे गोळा करण्याचे काम आई, वडील व बाजीरावच्या बायकोने उन्हातान्हात केले.
यंदा बटाटे पुण्याला विकू. पुण्याच्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो असे
नानुने बाजीरावला सुचवले होते. मागचा पुढचा विचार न करता नानू काय आपल्याला खोटा
थोडेच सांगणार म्हणून बाजीरावने पिकअप मध्ये सर्व बटाटे भरले. आतापर्यंत नानू आणि
नानुचे दोन तीन मित्र यांनी बाजीरावचा चांगलाच विश्वास संपादन केला होता. बटाटे विकण्यासाठी
निघाल्यावर बाजीरावने नानुला फोन करून येतोस का पुण्याला म्हणून विचारले. नानुने
हि दोन मित्रांना फोन करून बोलावून घेतले आणि सर्व जण बाजीरावचे बटाटे विकण्यासाठी पुण्याला गेले. सगळ्या
मार्केटमध्ये बाजीरावचा बटाटा एक नंबर दराने विकला गेला. ७०-८० हजार रुपये बाजीराव
ला मिळाले होते. चार सहा महिन्याच्या कष्टांचे चीज झाले असे बाजीराव ला वाटले. सर्व
मित्रांनी बाजीराव चे अब्भिनंदन केले. “पार्टी तो बनती है......” असे म्हनून बाजीराव ला पार्टीसाठी गळ घातली. “अर्थातच आपल्या जिगरी दोस्तांसाठी नाही तर कोणासाठी...” असे म्हणून बाजीराव तयार झाला. साधारण चाकण च्या पुढे निघाल्यावर, एका बियर बार जवळ गाड्या
थांबल्या. ए आज जरा चांगला ब्रांड मागवू असे म्हणून बाजीराव ने ब्ल्याक डॉग
व्हिस्की ची ओर्डर दिली. आणि हो येताना जरा चिकन चिल्ली, मटन मोगलाई वगैरे
चकण्यासाठी घेऊन ये..... बाजीराव ने वेटर ला फर्मावले. सर्व मित्र आज बाजीरावाच्या
कोद्कौतुकाचे गोडवे गाण्यात गुंग होते. बाजीरावलाही आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत
होते. दोन तीन पेग नंतर दारू ने मेंदूचा ताबा घेतला. प्रत्येकाला मी फार महत्वाचे
बोलतोय आणि बाकीच्यांनी फक्त माझेच ऐकले पाहिजे असे वाटू लागले. तर मध्येच कोणी
तरी भाऊ.... तू एकदम बरोबर बोलतोय असे म्हणून त्याला प्रोत्साहन
देत होता. विषय नक्की कोणता सुरु आहे हेच कोणाला कळत नव्हते आणि बोलत तर सर्वजन
होते. तेही फार महत्वाच्या विषयावर..... थोड्या वेळाने फक्त फुशार्कीच्या गोष्टी
सुरु झाल्या. प्रत्येक जन मी काय काय भीम पराक्रम केलेत यावर बोलू लागला आणि पेग
वर पेग रीचवू लागला. आपण कशी शून्यातून सुरुवात केली.... आणि परिस्थिती बदलवली हाच
केंद्रबिंदू प्रत्येकाच्या संभाषणाचा होता. यथेच्च पिऊन झाल्यावर जेवता जेवता
नारायणगाव जवळ एक संगीतबारी आहे असे सुचवले. संगीतबारी हा विषय तसा बाजीराव साठी
नवीन होता..... आता हे काय असतंय..... बाजीराव नशेत बरळला. बाकीच्यांनी संगीत बारी
म्हणजे काय हे याला माहित नाही... हा अजून अंड्यातून बाहेर आला नाही... म्हणून
हसून त्याची टर उडवली. बाजीराव पूर्णपणे नशेत होता. त्याला त्याच्यावर हसून केलेला
त्याचा अपमान सहन झाला नाही..... ए नान्या.... कॅह्ल आज संगीतबारी पहायची, असे
खडसावले. सगळे टुंग झालेले होते. कोणाला कशाची शुद्ध नाही.... मग काय ठरले बारीला
जायचे!
बारीजवळ उतरल्यावर नान्या बाजीराव ला म्हणाला ए बाज्या डे दहा हजार रुपये
चाल.... दहा हजार रुपये? कशाला दहा हजार रुपये? बाजीराव ने डुलत डुलत विचारले.
“अरे मग काय बारी फुकट असती काय? का तो सिनेमा आहे? दोनशे रुपयात तिकीट काढून बसायला. चल दे पैसे नाही तर चल परत.” नान्या ने निर्वाणीचे सुनावले. “च्यायला खिशात नाही अना आणि मला बाजीराव म्हणा” नान्याने बाकीच्यांना गाडीत बसायला सांगितले.
आता मात्र हा प्रतीष्ठेचा प्रश्न होऊन बसला होता बाजीराव च्या दृष्टीने. खिशात
पैसा डोक्यात नशा अजून काय होणे अपेक्षित होते. मग काय बाजीराव ने दहा हजार रुपये
भिरकावले नाण्याच्या दिशेने. आणि “ए नान्या हे घे पैसे चल आपण तुझ्यासारखे
भिकारचोट नाय” बाजीराव नशेत बरळत होता. सर्वजन आत घुसले. बाजीराव ने प्रथमच हि बरी बघितली
होती, पाहत होता. मराठी सिनेमा मध्ये जसे निळू फुले तक्क्याला पाठ लावून बसत असे व
समोर नाच गाण्याचा कार्यक्रम चालू असे, प्रचलित भाषेत त्याला मुजरा म्हणतात.
काहीसा असाच प्रक्रार तेथे चालू होता. भिंतीच्या कडेला मांडलेल्या गुबगुबीत
गादयांवर बाजीराव आणि बाकी मंडळी बसली. खोलीमध्ये उंची अत्तराचा वास दरवळत होता
आणि डोक्यामध्ये भिनत होता. डोक्यावर दारूने कब्जा केलेला होताच, वरून समोर
नाचगाणे सुरु झाल्यावर मंडळींना स्वतःवर ताबा राहिला नाही. विक्षिप्त चाळे करत
सर्वजन बारीची मजा घेत होते. आजूबाजूला तीच परीस्थिती होती. बेधुंद करणार वातावरण.
प्रत्येकाला नशेत असताना स्वर्गात आल्यासारखे वाटत होते. स्वर्गात अप्सरा नाचतात
म्हणे तसाच काहीसा प्रकार येथे सुरु होता यालाच स्वर्गसुख म्हणतात का? असे प्रश्न
पडावे असा तो धुंद करणारा प्रकार. कुणी कुणी १०० च्या नोटा उधळत होते, ती नर्तकी
मग हवेतच चुंबन देत असे, कुणी ओठावर ठेवून
त्या नाचणाऱ्या बाईला उचलायला लावत होते. आणि तिने ती नोट उचलल्यावर खुनशी नजरेने
बाकीच्यांकडे मिशीवर पिळ देत पाहत होते. मग कुणी शंभर च्या ५ नोटंचा पंखा बनवून
नजरेने त्या बाईला मांडीवर बसायला सांगत होते. असा सर्व एकंदर प्रकार तिथे चालला
होता. हळूहळू बाजीराव मधला बाजीराव जागा झाला आणि बाजीराव ने नोटा उधळण्यास
सुरुवात केली. आतापर्यंत बाजीराव आणि नान्या सोडला तर सार्वजन पेंगू लागले होते.
नान्याने बाजीराव ला “आता बस कर” म्हणून सांगितले. पण बाजीराव काही ऐकायला तयार नव्हते. अजून एक लावणी झालीच
पाहिजे म्हणून बाजीराव ने नोटांची गद्दी त्या बाईकडे फेकली. असे करता करता पहाटेचे
चार वाजले. नान्याने सर्व मित्रांना उचलून गाडीत बसवले बाजीराव ला फ्रंट सीटवर
बसवून गाडी घेऊन घरी घेऊन आला. सकाळी जेव्हा नाश उतरली तेव्हा सगळ्यांचे डोके दुखत
होते. रात्री आपण काय केले याचा थोडासा अंदाज बाजीराव ला आला . बाजीराव ने खिसे
चाचपले. सर्वच्या सर्व पैसे बाजीराव ने रात्री पार्टीत आणि बारीमध्ये उधळले होते.
बाजीरावच्या डोक्यामध्ये मुंग्या आल्या. काय केले आपण? बटाट्यासाठी अनालेलेल खते बी बियानेचे पैसे सुद्धा
आपण देणे बाकी आहेत. आईवडिलांच्या
बाय्कोपोरांच्या सहा महिन्याच्या कष्टाच्या बदल्यात साधा खाऊ आपण त्यांना आणू शकलो
नाही. आता आईबाबांना कोणत्या तोंडाने सांगायचे आपला बटाटा, तुम्ही व बायकोने
कष्टाने पिकवलेला बटाटा पुण्याच्या मार्केट मध्ये एक नंबर दराने विकला गेला. आपण
पिकवलेला बटाटा सर्वोत्कुष्ट होता. उन्हातान्हात राबणाऱ्या आपल्या मुलांसाठी एक
बिस्किटचा पुडा आणताना दहंदा विचार करणारे आपण ८० हजार रुपये अशा प्रकारे उधळले.
या वर्षी तूला चांगली साडी घेईल असे त्याने बायकोला वचन दिले होते. आणि बायकोने हि
तुम्हाला एक लिनेन चा शर्ट घेऊ असे सांगितले होते. आई आणि बायकोला एक एक दागिना
करून द्यायचे असेही त्याने मनोमन ठरवले होते. किती कष्ट उपसतात बिचार्या पण त्याची
दखल कोणालाच नसते. बाजीराव पूर्णपणे निराश झाला. घरात चिडचिड करू लागला.
एकदा झालेली चूक सुधारण्यासाठी सुद्धा नियतीने बाजीरावला संधी दिली नाही. त्या
वर्षी असलेले कर्ज जसेच्या तसे राहिले. पुढील वर्षासाठीच्या पिक उभारण्यासाठी
बाजीराव ने पुन्हा कर्ज घेतले. आणि यावेळी
मात्र त्याच्या मागे साडेसातीचा फेरा लागला. नापिकी, दुष्काळ, निसर्गाचे सम विषम
चक्र यामध्ये बाजीराव असा काही गुरफटला कि पूर्ण अर्थचक्र कोलमडून पडल.
‘व्याजाला झोप नसते’ असे म्हणतात, घेतलेल्या कर्जाचे व्याज फुगत गेले. कर्ज फेडण्यासाठी मोठ्या
हौसेने घेतलेले टँक्टर विकावे लागले. यातून अधिकच निराशा पदरी पडली.
चाकणच्या पार्टीमध्ये मौजमजा करू लागलेले मित्र त्याला बघून रस्ता बदलू लागली.
त्याच्याशी बोलणे टाळू लागली. खरा तर अशा वेळी मित्राच्या सहानुभूतीपूर्वक
शब्दांची खूप गरज असते माणसाला. यातून नवीन उभारी घेता येऊ शकते. पण त्याचीच
सगळीकडे वानवा होती. पार्टीत / बारीत मजा करणाऱ्या मित्रांनीच नंतर बाजीरावाने
पार्टीत कसा ‘माज’ केला याबद्दल गावभर बोलू लागले. इकडून तिकडून बाजीरावाच्या
कानावर या चर्चा येत मग मात्र बाजीरावला अश्रू अनावर होत. फार मोठी चूक झाली
आपल्या हातून, फार मोठे पाप घडले अशा विवंचनेत बाजीराव स्वतःला कोसत राहिला, दोष
देत राहिला. आधीच शांत असलेला बाजीराव फारसा कुणाशीच बोलत नसे मात्र आतल्या आत
धुमसत राहिला. त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता.
वर्षभर उन्हातान्हात काम करणाऱ्या आईवडिलांना बायकोला साधे अंगभर कपडे घेऊ शकत
नाही आपण. पोरांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायचे आपले स्वप्न अधुरेच राहणार
का? खरे तर तो पैसा त्यांच्या कष्टाचा होता. आपण फार चुकीचे वागलो अशा विचारांनी
बाजीराव आणखीच खंगत गेला.
दोन चार वर्षापासून पाणी पाउस नसल्याने विहीरही आटली होती. गावात कुणालाच पाणी
नसल्याने मजुरीची कामे मिळणेही दुरापस्त झाले होते. अशात राहिलेले कर्ज
फेडण्यासाठी बाजीराव मागे तगादा सुरु झाला. आता मात्र बाजीरावाच्या पायाखालची जमीन
सरकली होती. आणि या सर्व नैराश्यामध्ये
बाजीरावाने घरात शिल्लक असलेले कीटकनाषक प्राशन केले. आणि शेतात जाऊन झोपून राहिला. पण जसजसे किटकानाषक
अंगात भिनू लागले तसतसा त्रास व मरणयातना बाजीरावाला होऊ लागल्या आणि तो तडफडू
लागला. आणि घराकडे पळत सुटला शेजारपाजार्यानी त्याला उचलले व हॉस्पिटलला घेऊन
गेले. बातमी कळल्यावर आम्हीही हॉस्पिटलला निघालो होतो. गाडी हॉस्पिटलजवळ येऊन
थांबली विजू म्हणाला अवि उतर हॉस्पिटल आले. तेव्हा कुठे मी भानावर आलो आणि गाडीतून
उतरून होस्पिटलच्या पायर्या चढू लागलो. होस्पितालच्या पायर्यांवर बाजीरावच्या
वडिलांना डोक्याला हात लावून बसलेले पहिले आणि काळीज कळवले. बाजीरावच्या आईने मला
पाहून मोठ्याने हंबरडा फोडला. डोळ्यात तरळणारे अश्रू रुमालाने टिपले आणि एका
शेतकर्याचीच आत्महत्या का? हा विषय डोक्यात गर्दी करू लागला.
(५-२-२०१६)